मुंबई, (प्रतिनिधी ) - नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाने कार्यक्रम जाहीर...
मुंबई, (प्रतिनिधी )- नागरिकांच्या मागास प्रवर्गास आरक्षण देण्यासंदर्भात नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी समर्पित आयोगाने कार्यक्रम जाहीर केला आहे. नागरिकांना वेळेत निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आवाहन आयोगातर्फे करण्यात आले आहे.
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायती आणि शहरातील महानगर पालिका, नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी, व्हीजे एनटींना आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे महाराष्ट्र शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे.
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणा-या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागावर कार्यक्रम जाहीर केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपली मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावेत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी करावी असे आयोगातर्फे प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात २१ मे रोजी सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत, औरंगाबाद विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत, नाशिक विभागीय कार्यालयात २२ मे रोजी ५.३० ते ७.३० या वेळेत, कोकण भवन विभागीय आयुक्त कार्यालयात २५ मे रोजी २.३० ते ४.३० या वेळेत, अमरावती विभागीय कार्यालयात २८ मे रोजी ९.३० ते ११.३० या वेळेत, नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात २८ मे रोजी ४.३० ते ६.३० या वेळेत नागरिकांना आपली मते आयोगापुढे मांडता येतील.
ओबीसी आरक्षण व न्याय हक्कासाठी समर्पित आयोगास ओबीसी समाज बांधवांनी विभागस्तरावर निवेदने द्यावीत - कल्याणरावजी दळे प्रदेशाध्यक्ष बारा बलुतेदार महासंघ
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसी,व्हिजेएनटि यांच्या न्याय हक्कासाठी व राज्य सरकारने आयोग नियुक्त केला असून आयोग विभाग स्तरावर भेट देऊन नागरिकांच्या समशा जाणून घेणार आहे. ओबीसी बांधवांनी आयोगास भेटून आपल्या मागणीचे निवेदन द्यावे असे आवाहन बारा बलुतेदार महासंघांचे प्रदेश अध्यक्ष कल्याणराव दळे यांनी केले.
COMMENTS